प्रकाशबेटं
या बाया कुठूनकुठून आलेल्या?
बायांचं हे चाललेय काय?
प्रश्न पडू लागलेत आता
अनेकांना!!
देताहेत त्या नारा
निर्भय बनो चा
शाहिन बागेत दटून बसुन.
पुण्यातही बसल्या होत्या
रातच्या पारी, आणि
नागपाड्यातही.
जामियात, जेएनयुत पण
भळाळत्या जखमांसह
ठाम उभ्या ठाकल्यात.
हे पाणी काही वेगळंच आहे,
व्यवस्थेची अस्पष्ट कुजबुज
आणि दबकते इशारे.
दमनकारी यंत्रणा आणि
सत्तेचा माज
नाही हलवू शकत
तसुभरही या बायांना.
नाही शिरु देत या बाया
त्यांच्या विश्वात सहजासहजी
अनाहुतांना…
पण वेळ आली की
गांजलेल्या, पिचलेल्या या बाया
पेटून उठतात एका रात्रीत,
धाव घेतात आरेच्या जंगलात
आणि गेटवे ऑफ इंडियाला.
भेटतात या नजीबच्या आईला
समजून घेतात रोहितला
सोबत राहतात एकमेकींबरोबर
डुब आल्यावर हातात हात धरुन.
माहुलच्या घरांतून बाहेर पडून
रस्त्यावर मांडतात संसार
आणि उध्वस्त न होता
लढतात, सावरतात एकमेकींना.
नाही म्हणायला शिकतात
या बाया बेडरपणे,
इथेच जिंकतात या बाया
युगानयुगाचा संघर्ष
एका लिंगसत्ताकाशी चाललेला.
या निरंतर लढ्यात
सामिल आहेत काही बाप्येही
समतेच्या वाटेवर भेटलेत
त्यांनाही जोतिबा न् गांधीबाबा.
केवळ बाप्यांच्या साथीने
नाही सरशी होत या बायांची
तर जिंकण्याचा कैफच
चढत नाही बायांना.
त्या करत राहतात त्यांचं काम
अव्याहतपणे
कसलीच तमा न बाळगता.
यालाच घाबरते व्यवस्था
आणि सुरू होतो
एक सुडाचा प्रवास
जो घेऊन डुबणार असतो
त्या व्यवस्थेच्या वाहकाला.
बाया उभ्या राहतात परतपरत
राखेतल्या फिनिक्ससारख्या,
बुडताना सगळं सावरतात
आणि वसवतात पुन्हा सगळं.
बुडवणं हा व्यवस्थेचा स्थायीभाव
आणि निर्मिती ही बायांची हातोटी.
आज बाहेर पडल्यात बाया
देश वाचवायला, नवनिर्मितीला.
आता वळून नाही बघणार
या बाया
थांबणार नाहित,
जुमानणार पण नाहित
फतवे आणि आदेशांना.
एक एक चिंगारी पेटलेय
या बायांच्या मनामनात
मशालीत बदलल्यात या बाया
मशाल होऊन कारवाँ निघालाय
पेटवायला नाही तर प्रकाशवाटा उजळायला,
स्वत: प्रकाशबेटं बनून...
सिरत सातपुते
२९ जानेवारी २०२०
No comments:
Post a Comment