जागतिक महिला दिन
'#मुक्कामपोस्टगोरेगाव' ची सुरवातच करतेय जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमापासून. वर्ष २०१० आणि ठिकाण गोरेगाव रायगड. गोरेगावच्या विकासात महिलांचे योगदान असा विषय घेऊन प्रथमच गोरेगाव रायगड येथे महिला दिन साजरा करण्यात आला. सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिकेची मालक मुद्रक प्रकाशक सिरत सातपुते आणि पत्रिकेचा संपादक तिचा सहचर विजय सातपुते हे दोघे नुकतेच पाच महिन्यांपूर्वी मुंबईतून गावाकडे परत आलेले. विजय मुळचा गोरेगावचाच. चळवळ, वाचन, लेखन करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतर गावाकडे आलेला. गावाकडच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीत असलेला इंग्रजीचा गंड घालवण्यासाठी गावात क्लासेस चालू केलेली सिरत, गावातल्या विविध वयोगटांना इंग्रजी भाषेबद्दलच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी काहीना काही करत होती. गावाला आल्या आल्याच विजयला कोमसाप गोरेगावच्या अध्यक्षपदाची माळ घातली गेली आणि दोघेही आपापल्या कामात गढून गेले. सोबतीला विजयचे आजारपण होतेच.
दर महिन्याला सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिकेचे अंक निघत होते. विजयच्या अध्यक्षतेखाली मराठी दिन वेगळा व महत्वाचा विषय घेऊन वैचारिक अंगाने साजरा झाला होता आणि सिरतला वेध लागले महिला दिन साजरा करण्याचे. गोरेगावच्या इतिहासात अशा प्रकारे महिलांसाठी खास काही तोपर्यंत साजरे झाले नव्हते (संक्रांतीचं हळदीकुंकू व्हायचं म्हणा). जवळच असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाशी जोडलेल्या सिरतला हा महिला दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितिचे प्रभाकर नाईक (नाईक तात्या) यांनी साथ दिली आणि मग 'गोरेगावाच्या विकासात महिलांचे योगदान' या विषयावर चर्चासत्र आणि असं योगदान दिलेल्या महिलांचा सत्कार असा कार्यक्रम करण्याचं ठरलं.
८ मार्चला असलेल्या जागतिक महिला दिनाबरोबरच १० मार्चला येणाऱ्या सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचंही औचित्य साधायचं ठरलं आणि सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिका आणि महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गोरेगाव रायगड शाखेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करायचा घाट घातला गेला. प्रसिध्द साहित्यिक वामन मल्हार जोशी हे गोरेगावातीलच. त्यांच्या नावे असलेल्या वा. म. जोशी वाचनालयात ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम करायचा ठरला.
कार्यक्रम तर ठरला. ठरवलेला कार्यक्रम तडीस नेणं तसं कठीण काम. पण नाईक तात्या आणि विजय यांच्या सोबतीने गावातील मान्यवरांच्या आणि ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या मदतीने गोरेगावातील विकासातील महिलांच्या योगदानाची माहिती मिळवली आणि चर्चासत्राला बऱ्यापैकी आकार यायला लागला. नाईक तात्यांनी महिलांच्या गटांबरोबर बोलून कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असेल याची काळजी घेतली आणि म्हणून कार्यक्रम दुपारी ४ वाजता महिलांच्या सोयीने ठेवला.
तसं बघितलं तर शहरातील महिलांना तोपर्यंत महिला दिनाचं अप्रुप काही राहिलेलं नव्हतं. बऱ्यापैकी सगळीकडे असे कार्यक्रम होत होते. पण गोरेगावसारख्या गावात असा बिगरसांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी करणे तसं धाडसाचंच होतं. त्यात गावात त्यावेळी असलेल्या एकमेव सभागृहात म्हणजेच वाचनालयात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत सांगण्यात आलं होत की निम्मं सभागृह जरी भरलं तरी कार्यक्रम यशस्वी होतो. म्हणजे निम्मं सभागृह तरी भरेल की नाही याचीही खात्री नसते. ग्रामस्थ फार काही फिरकत नाहीत आणि महिलांची उपस्थिती तर अगदी नगण्यच.
जरा धाकधूकीतच कार्यक्रम सुरू केला. सुरवातीची उपस्थिती अर्ध सभागृह भरेल एवढी होती. म्हणजे कार्यक्रम यशस्वी होईल असं वाटायला लागलं. नाईक तात्यांनी सूत्रसंचालन करायला सुरवात केली. कार्यक्रम पुढे सरकत गेला आणि हळूहळू सभागृह तुडुंब भरलं. तुमच्या या कार्यक्रमात आम्ही पुरुष आलो तर चालेल ना असं म्हणून आलेल्या पुरुषांनी सभागृहाबाहेर रस्त्यावर गर्दी केली आणि गोरेगावातील विकासातील महिलांच्या योगदानाला कार्यक्रम यशस्वी करुन गोरेगावातील महिला व पुरुषांनी मनापासून दाद दिली.
आज तेरा वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. या कार्यक्रमानंतर गोरेगावात नेमाने महिला दिन साजरा व्हायला लागला. वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या विषयांवर साजरा होत राहिला. २०१५ला मुंबईला परत आले आणि माझ्यासाठी तरी गोरेगावचा महिला दिन हळूहळू विस्मृतीत जमा झाला. पण यंदाच्या महिलादिनानिमित्त व्हय मी सावित्रीबाई... चा प्रयोग कालच गोरेगावात पार पडला आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं समाधान वाटलं!!
२०१० साली महिलादिनाला सावित्रीबाईंना जोडल्यानंतर आलेले बरे वाईट अनुभव पुढे कधीतरी!! तोपर्यंत वाचत रहा, #मुक्कामपोस्टगोरेगाव
सिरत सातपुते
८ मार्च २०२३
#मुक्कामपोस्टगोरेगाव
#लेखणीतून