बाळा, तसा तुझा जन्म उशीराचाच
तुझ्याआधीही होते मी सृजन संपन्न
भरल्या घरात नांदत्या गोकुळात
बुध्दी आणि गुणसंपन्न तू
अलगद माझ्या पोटी आलास.
वाटलं होतं तूझ्या जन्मानंतर
तू शिकशील जगरहाटी
भावंडांवर प्रेम करशील
आणि तुझ्या बलदंड बाहुंवर
मला तोलून धरशील.
तसं सुरवातीला बरं चाललं तुझं
तू रमलास भवतालात
दऱ्याखोऱ्यांत स्वच्छंदपणे
जगू लागलास सहजपणे
तुझ्या जगण्यात मला सुखावत.
जोवर तू होतास नर आणि मादी
तू सृजनातला एक भाग होतास
तोवर बरं चाललेल तुझं
आणि अचानक जागी झाली
जगण्यातली तुझी ती तृष्णा!
पडू लागले प्रश्न तुला
आणि झालास तू सैरभैर
तू शोधत होतास उत्तरं
आणि मिळवत गेलास ती
तू लावलेल्या प्रत्येक शोधासरशी.
तूझी दमछाक होताना पहात होते मी
पण तू होतास शोधाच्या मस्तीत
सुखावत होते मी तुझ्या आनंदात
तुझे बलदंड बाहु खुणावत होते मला
विसावणार होते मी तृप्तीत.
पण मग मला दिसली तुझ्या डोळ्यात
ती हिंस्त्र मृगतृष्णा
आपल्याच सहचरांचा घास घेणारी
शिडीचा उपयोग करुन
तिला फेकून देणारी.
तू चालत होतास अथकपणे
काबीज करत होतास
नवनवीन शिखरे
तू काढत होतास वाट
आपल्याच सहोदरांचा गळा घोटून.
भ्यायले, थरकापले, गुदमरले मी
तुला थांबवले, रागावले, चिडले
तू आपला ठिम्म, उन्मत्त
कठोरपणे चालूच ठेवलस
जन्मदात्रीला ओरबाडणं.
जखमी रक्तबंबाळ मी
हिशोब अासवांचा करत होते
पापाचा घडा भरलाय म्हणत
वठणीवर आणू पहात होते
मातृह्रदयाने तळमळत होते.
सुक्ष्म जीव तो करोनाचा
चिंतीत होऊन विचार केला
जगाला आणि मला वाचवायला
स्वतःहून पुढे आला
स्वतः खलनायक झाला.
सहचर आणि सहोदरांच्या
वाट्याला तो नाही गेला
पृथ्वीतलावर हाहाकार माजवला
माणसा तुला हतबल केला
बुध्दीचा अहंकार पायतळी आणला.
तुझ्याच अतिरेकामुळे
हा दिवस तुला दिसला
मीही एक जीव साधा
असंच जर मानलस मानवा
तरच सुटेल हा विळखा.
पड बाहेर यातून प्रयत्ने
अन् वाचव पुढच्या पिढ्यांना
परतुनी ये निसर्गाकडे
कवेत घे ही सृष्टी आनंदे
हाच उपाय आता उरला.
उन्मत्त परि राहिलास अजूनी
नामशेष होशील निमिषार्धी
करोना ही तर झलकच याची
खूणगाठ ही बांध मनाशी
धमकी नाही ही तर वस्तुस्थिती.
वसुंधरा मी जननी तुझी
देते तुला हा आर्त इशारा
ये सोबत माझ्या आज लेकरा
चल वसवुया नव्या जगता
बहरवुया तुझ्याच वंशवेला.
सिरत सातपुते
२२ एप्रिल २०२०
आज आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस!!
गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे निसर्गात असणारी जैविक साखळी विस्कळीत होतेय. या विस्कळीत झालेल्या साखळीमुळेच कोरोनासारखे संकट जगावर आले आहे. आपण मानव प्राणी या संकटाला कारणीभूत आहोत. वसुंधरेवरची जैवविविधता टिकवण्याची जबाबदारी खरं म्हणजे या जैवविविधतेचाच भाग असलेल्या बुध्दीमान अशा मानव प्राण्याची होती. पण याच माणसाने स्वतःच्या हव्यासापोटी ही जैवविविधता धोक्यात आणली आहे. आज करोनाच्या पार्श्वभूमीवर वसुंधरेचं पत्र म्हणूनच महत्वाचं आहे. या पत्रातून काय इशारा देतेय वसुंधरा माणसाला? वाचुया वसुंधरेचं पत्र या माझ्या कवितेत, `लेखणीतून...´ या ब्लॉगवर. वसुंधरादिनानिमित्त लिहिलेली ही कविता आजच्या जैवविविधता दिनाच्या निमित्ताने प्रकाशित करत आहे.
सिरत सातपुते
२२ मे २०२०
No comments:
Post a Comment