बा मृत्यो, तू येतोस
वेदनांचे कल्होळ घेऊन,
तू येतोस निर्दयीपणे
संचीतातून कठोरपणे नेतोस
तूला हवं असलेल्या कोणालाही,
हीच तुझी ओळख सर्वांसाठी.
तूझं येण जरी अपेक्षित
स्वागत नाहीच तरीही
तूझं येण लांबवण्यातच
प्रयत्नांची पराकाष्ठा
आणि ते लांबवण यातच
इतिकर्तव्यता!!
कारण तू घालून ठेवलीस
तुझी भिती मनामनात
आणि उलगडले नाहिस कधीही
तुझ्यानंतरचे विश्व,
नाही कधी बघीतली कोणी
ती आवर्त पोकळी
आणि तिथलं जीवन.
मी घाबरत नाही तुला
कारण मी ठरवलय स्पष्टपणे,
ते जग बघायचा विचार
केव्हाच टाकलाय मागे
आणि चालू लागलेय त्या वाटेवर,
तू येणार आहेस ही भावना
आताशा हावी नाही होत माझ्यावर.
मला आकळलय आता
तुझं अस्तित्व आणि
तुझी अपरिहार्यता.
म्हणूनच मैत्रीचा हात पुढे करुन
सोबतीचा प्रस्ताव मांडलाय.
मी बोलत राहीन तुझ्याबरोबर,
अविरत चालत राहिन तु़झ्या सोबत
पण खबरदार असेन नक्कीच
की तुझी माझी ही मैत्री
घाला नाही घालणार
माझ्या अस्तित्वावर,
जे जपलय मी जीवापाड.
तुझं माझं मैत्र हे
अनाकलनिय, गूढ
तरिही शांतवणारं आणि
भेटीची ओढ लावणारं.
तू भेटलास कधीकाळी
तर थांबेल काळ माझ्यासाठी
आणि स्मृतिशेष होऊन जाईल
माझं अस्तित्व.
आणि पुसून जातील माझ्या पाऊलखुणा.
मला चालणार आहे काळांचं
थबकणं आणि
वयाचा आकडा कॅलेंडरवर अडकणं.
मला चालणार आहे
माझं स्वतःचं काळाबरोबर थांबण.
आणि म्हणूनच बा मृत्यो,
मी तयार आहे,
माझं अस्तित्व स्मृतित अनुभवायला
माझ्या संचितातील
एक वाटा तुला द्यायला.
सिरत सातपुते
११ नोव्हेंबर २०१९
No comments:
Post a Comment